महसूल विभाग
“शासन आपल्या दारी” कार्यक्रमात सहभाग नोंदवावा-आवाहन

न्यूजसेवा
अ.नगर-(प्रतिनिधी)
शिर्डी येथे होणारा शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमात सर्व विभागांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा अशा सूचना राज्याचे महसूल,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिर्डी विमानतळ काकडी ता.कोपरगाव येथे ०६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी मान्यवर उपस्थिती होते.
पालकमंत्री श्री. विखे म्हणाले की,”शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जनजागृती गावा गावापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजन करावे.कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रम स्थळी आणण्याची व परत सोडण्याची एसटी वाहातूक व्यवस्था करावी कार्यक्रम स्थळी भोजन व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी आदि सर्व सुविधांचे सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
या आढावा बैठकीत महसूल विभाग,आरोग्य विभाग,वाहतुक विभाग,सार्वजनिक बांधकाम आदि विभागांचा आढावा घेण्यात आला.कार्यक्रमाला सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.