निवडणूक
राज्य पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली.माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झालीआहे नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सहकारातील ही निवडणूक सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी,भाजपचे नेते प्रवीण दरेकर,सहकार व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर,भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे,सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, मल्टिस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे,तसेच सर्व सहकाऱ्यांमुळे बिनविरोध झाली,याचा आनंद आहे. सहकार क्षेत्र राजकारणविरहित असावे हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.
फेडरेशनच्या २१ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ७२ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र, कोयटे यांनी जोशी यांच्याशी चर्चा करून अंतिम २१ जणांची नावे उमेदवारीसाठी जाहीर केली होती. त्यातील भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, महिला आरक्षित प्रवर्ग आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातून १६ जागांसाठी २० अर्ज होते. हे अतिरिक्त चार अर्ज बुधवारी (ता. २१) माघारीच्या अंतिम दिवशी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे काकासाहेब कोयटे यांनी सांगितले.
फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष असलेले काकासाहेब कोयटे यांनी १९९० सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले असून, गेली १४ वर्षे ते अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. राज्यभर १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणाऱ्या या संस्थांचे सव्वा दोन कोटी सभासद असून, दोन लाखांवर पदाधिकारी आहेत. या १६ हजार संस्थांच्या तब्बल ५० हजार शाखा आहेत. त्यातील दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनिधींमार्फत राज्यभरातील एक कोटी कुटुंबांशी, म्हणजेच सुमारे तीन ते चार कोटी व्यक्तींशी या पतसंस्था चळवळीचा संपर्क येतो. फेडरेशनचे शिर्डी येथे स्वत:चे अद्ययावत व सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्रही आहे.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (अहमदनगर), वसंत शिंदे (मुंबई), राधेश्याम चांडक (बुलडाणा), दादाराव तुपकर (जालना), डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद), शशिकांत राजोबा (सांगली), चंद्रकांत वंजारी (ठाणे), अड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पुणे), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), नारायण वाजे (नाशिक), राजुदास जाधव (यवतमाळ), सुरेश पाटील (रायगड), अड. अंजली पाटील (नाशिक), भारती मुथा (पुणे) व शरद जाधव (पालघर) आदींचा समावेश आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार मंत्री,सहकार प्रधान सचिव,आयुक्त आदींनी अभिनंदन केले आहे.