कोपरगाव शहर वृत्त
निवडणूकपूर्व विकासकामांचा उद्घाटन धडाका!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आपल्या विश्वासावरच मला कोपरगावचा चेहरा-मोहरा बदलवता आला असून कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपली साथ अशीच राहू द्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी कामांचे उद्घाटन करताना केले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील या विकासकामांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर मनमाड रस्ता करणे,आढाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे,जानकीविश्व-रिद्धी सिद्धीनगर प्रमुख रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे,जानकी विश्व-श्री म्हसोबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,गंगा माता मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,आढाव वस्ती पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामांचा सामावेश आहे.
मुंबई,ठाणे,पुणे महानगरपालिकांसाठी ४ सप्टेंबर, तर १९ महानगरपालिका आणि २५०पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना १ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले होते.सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीसह २९ महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचयात समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता तो नुकताच पूर्ण झाला आहे. कोपरगाव शहरात १५ प्रभाग जाहीर केले आहे. त्यातून ३० नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. शंख, तुताऱ्या,नगारे वाजण्यास प्रारंभ झाला आहे.”जागते राहो…! ची हाळी झाली आहे. परिणामी कार्यकर्त्यांनी काम वर केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पालिका आणि महापालिका हद्दीतील एकच कामांच्या उद्घाटनाचा धडका सुरू झाला आहे. त्याला कोपरगाव नगरपालिका अपवाद नाही. शेवटची संधी म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. आ. काळे याबाबत मागे राहू इच्छित नाही.त्यांनी कोपरगाव शहरातील प्र.क्र.०२ मध्ये १ कोटी ५९ लक्ष रुपये निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आहे.याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,कोपरगाव शहरात मागील पाच वर्षात मोठी विकासकामे पूर्ण झाली आहे.सर्व सामान्य जनता व विशेषतः महिला भगिनींना भेडसावणारा पाणी प्रश्न पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सुटला असून नागरीकांना तीन ते चार दिवसांनी नियमितपणे पाणी मिळत आहे परंतु कोपरगावच्या नागरिकांना दररोज पाणी कसे मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरु असून त्यामध्ये यश देखील मिळणार आहे. कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये राबवलेली विकासकामं ही जनतेच्या विश्वासातून आणि सहकार्यामुळेच शक्य झाली आहेत. शहरातील नागरिकांनी विकासाची दिशा ओळखून वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे कोपरगाव शहर जिल्ह्यात एक प्रगतशील शहर म्हणून कोपरगाव शहर पुढे येत आहे.यापुढेही आपल्याला कोपरगाव शहरातील अनेक विकास कामे पूर्ण करायची असून स्वच्छ,सुंदर,सुरक्षित आणि विकसित कोपरगाव घडवण्याचा संकल्प पूर्ण करायचा असल्याचे गुलाबी चित्र रंगवले आहे.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जसा आजपर्यंत तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी होता, तसाच तो यापुढेही ठेवावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना केले आहे.