कृषी व दुग्ध व्यवसाय
…या तालुक्यात पावसाचं जोरदार हजेरी ! पेरणी पूर्व मशागतीस वेग
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2024/06/images288329.jpeg)
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील दोन तीन दिवसांपासून कोपरगाव तालुक्यातील बहुतांश भागात मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली असून,जोरदार पावसाने ओढे-नाल्यांना काही अंशी पाणी आल्याने व पेरणीपूर्व मशागतीस वेग येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आतापर्यंत झालेल्या पावसात तालुक्यातील पाच महसूल मंडळांपैकी रवंदे मंडळात सर्वाधिक असा २६ मि.मी.पाऊस झाला तर सर्वात कमी दहिगाव बोलका या मंडळात १० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.मात्र कोठेही जीवित हानी झाली असल्याची नोंद नसल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2024/06/images2884297818873144284238892.jpg)
कोपरगाव शहरात गत चोवीस तासात १० मी.मी.तर तालुक्यातील रवंदे येथे सर्वाधिक २६ मी.मी.सुरेगावात १९ मी.मी.तर पोहेगावात ११ मी.मी.दहिगाव बोलका येथे सर्वाधिक कमी १० मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यंदा तापमानाने उचांक गाठला होता.तापमान ४०-४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते.उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते.काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे करंजी,पढेगाव,आपेगाव आदी ठिकाणी नुकसान झाले होते.मात्र त्यामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील बहतांश भागात मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन दिवसभर कडाक्याचे ऊन तर सायंकाळी वादळी वारे आणि आभाळ येत काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली असताना सलग दोन दिवस पावसाने विजांच्या सौम्य कडकडाटासह कोपरगाव शहरासह रवंदे,दहिगाव बोलका,पोहेगाव,सुरेगाव,वादळी पावसामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसून येत आहे.
दरम्यान पावसाने लावलेल्या हजेरीने कोपरगाव शहरात गत चोवीस तासात १० मी.मी.तर तालुक्यातील रवंदे येथे सर्वाधिक २६ मी.मी.सुरेगावात १९ मी.मी.तर पोहेगावात ११ मी.मी.दहिगाव बोलका येथे सर्वाधिक कमी १० मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.सुदैवाने या सर्व मंडळात कोठेही नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे प्रशासनास दिलासा मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.