आंदोलन
ओढ्या नाल्यावरील बंधाऱ्याची निकृष्ट निर्मिती-…यांचा आरोप

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहील्यानगर येथील जिल्हा परिषद व लघु पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओढया,नाल्यांवर कित्येक वर्षापासून बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्याच्या उत्तरेला ए.सी.व बी.सी.नाल्यावर अनेक बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १९९५ मध्ये मौजे सराला येथे एसी नाल्यावर उभारलेल्या बंधाऱ्याची अवस्था वाईट आहे.सदर बंधाऱ्याच्या निर्मितीच्या पहिल्याच वर्षी पहिल्याच पावसात मातीच्या भिंती वाहून गेल्या असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी नुकताच एका निवेदनाद्वारे केला आहे.

“ओढ्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारलेल्या बंधाऱ्याच्या पाणी अडविण्यासाठी घोड्याला आडव्या टाकलेल्या सिमेंट भिंतीमुळे बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे.सदर भराव वाहून गेल्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे जवळपास दहा एकर क्षेत्र ओढ्याने दिशा बदलल्यामुळे बाधित झाले आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,अहिल्यानगर जिल्हा.
जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाकडे ० ते २०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजना येतात.त्या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनाच्या लेखा शिर्षातुन प्रामुख्याने कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे,साठवण बंधारे लघु पाटबंधारे तलाव,पाझर तलाव,साठवण तलाव,सिमेंट नाला बांधकाम इत्यादी बांधकाम करणे वा त्याची देखभाल,दुरुस्ती करणे इत्यादी बाबी तांत्रिक शाखेकडुन कार्यान्वीत करण्यात येतात.तसेच वेळोवेळी शासनाने प्रस्तावित केलेल्या विविध योजना मधुन तलावातील गाळ काढणे,नाला खोलीकरण व गाळ काढणे इत्यादी कामे प्रामुख्याने केल्या जातात.मात्र या विभागांतर्गत केलेली कामे श्रीरामपूर तालुक्यात अडचणीत आली आहे.याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आरोप केले आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,”ओढ्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारलेल्या बंधाऱ्याच्या पाणी अडविण्यासाठी घोड्याला आडव्या टाकलेल्या सिमेंट भिंतीमुळे बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे.सदर भराव वाहून गेल्यामुळे शेजारील आबासाहेब,विलास,वाल्मीक,सोपान,ज्ञानेश्वर औताडे यांचे जवळपास दहा एकर क्षेत्र ओढ्याने दिशा बदलल्यामुळे बाधित झाले आहे.याबाबत सदर शेतकऱ्यांनी १९९५ पासून तत्कालीन तालुक्याचे आमदार,गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना सातत्याने निवेदने देऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली असून अद्याप पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याबाबत दखल घेतली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी पंचायत समिती श्रीरामपूर येथे गेल्या सहा महिन्यापासून तक्रार अर्ज करूनही त्याबाबत अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही.
दरम्यान असाच प्रकार बीसी नाल्यावर असलेल्या माळेवाडी दगडी साठवून बंधाऱ्याच्या बाबत दिसून आला आहे.सदर बंधारा जून २००२ मध्ये तत्कालीन आ.जयंत ससाणे यांच्या प्रयत्नातून चांगल्या दर्जाचा केला गेला होता.सदर बंधाऱ्यावर पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रुपये ११ लाख निधी एप्रिल २०२५ मध्ये टाकला होता.सदर निधी मधून लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विनायक पंडोरे यांनी बंधाऱ्याची असलेल्या सिमेंट भिंतीची उंची व जाडी वाढविली होती.तथापि त्या प्रमाणात मातीच्या भरावाची क्षमता वाढविली नव्हती.याबाबत त्यांनाही लाभधारक शेतकऱ्यांनी वारंवार फोन करून पोकलॅण्ड मशीनद्वारे खोलीकरण करून मातीच्या भरावाची जाडी व उंची वाढविण्याचे काम केले.परंतु त्यांनी सदर सूचनाची कुठलीही दखल घेतली नाही.मातीच्या भरावाची क्षमता कमी असल्याने जास्त पाऊस झाल्यास सदर भराव तुटून संबंधित शेजारील शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत आहे.एकूणच जलसंधारणाच्या कामांमध्ये फक्त निधी टाकला जातो प्रत्यक्ष कामाचा दर्जा व गुणवत्ता याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे व याबाबतची दखल प्रशासनाने न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येवून नुकसान भरपाई मागण्यात येईल असा इशाराही शेवटी या निवेदनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
त्यांनी सदर निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता लघु पाटबंधारे विभाग अहिल्यानगर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अहिल्यानगर आदींना देण्यात आल्या आहेत.यावेळी साहेबराव चोरमल,दिलीप ल.औताडे,भागचंद द.औताडे,दिगंबर अ.औताडे आदींनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.