आंदोलन
पाझर तलावाचा सांडवा बंद,लोकवस्तीस धोका-तक्रार !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी असलेल्या शहापूर हद्दीतील जुने देवगाव तथा ओस पांढरी येथील सन-१९८२-८३ साली बांधण्यात आलेला पाझर तलावाचा सांडवा काही असामाजिक तत्वांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने अडवला असून त्यामुळे या पाझर तलावाच्या लाभक्षेत्रात खाली असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याबरोबरच बंधारा फुटून लोकवस्तीचे नुकसान होऊ शकणार असल्याची गंभीर तक्रार शहापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता रमेश डांगे यांनी एका निवेदनाव्दारे आ.आशुतोष काळे यांचेकडे केली आहे.

“शहापूर येथील सांडवा अवैधरित्या बंद केल्याबाबत कोपरगाव येथील जलसंधारण उपविभाग आणि संगमनेर येथील जलसंपदा विभाग आदींनी तातडीने याबाबत दखल घेऊन या सांडव्याचा निर्णय घ्यावा;अन्यथा या गावातील शेतकरी आंदोलन करतील व याची जबाबदारी जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभागावर राहील”-योगिता रमेश डांगे,सरपंच,शहापूर ग्रामपंचायत.
उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे निळवंडे कालवा कृती समितीच्या लढ्याला यश मिळून काम मार्गी लागून दोन वर्षे उलटली आहे.दोन वर्षात जवळपास पाच वेळा लाभक्षेत्रात असलेले पाझर तलाव भरून दिले आहे.मात्र कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,शहापूर,बहादराबाद,अंजनापुर,सायाळे,मलढोण,दुशिंगपुर आदी गावे पाण्यापासून वंचित राहिली असली तरी कोपरगाव तालुक्यातील शहापूर या गावाच्या पश्चिमेस ०१ कि.मी.अंतरावर असलेल्या जुने देवगाव तथा ओसपांढरी येथील पाझर तलाव नुकताच निळवंडे धरणाचे पाण्याने जवळपास ६०-७० टक्के भरला आहे. शहापूर हद्दीतील ओस पांढरी येथील पाझर तलावात दोनदा पाणी आले आहे.मात्र येथील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या तलावाचा सांडवा जलसंधारण विभागाने सन-१९८२-८३ साली चुकीचा केला असल्याचा आरोप केला आहे व त्याबाबत पाथरे खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच आणि पाथरे शिवारातील शेतकरी आदींनी शहापूर पाझर तलाव भरल्यानंतर त्या सांडव्यातील पाणी आमच्या शेतात जात असल्याने त्या पाण्यामुळे आमचे सुमारे ५०० एकर क्षेत्र बाधित होत असल्याची तक्रार करून त्या पाझर तलावाचा सांडवाच आश्चर्यकारकरित्या बंद करून टाकला आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव येथील जलसंधारण विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे अधिकारी आदींनी दि.१२ जून २०२५ रोजी समक्ष भेट दिली असून यात त्यांनी या पाझर तलावांस भेट दिली असून त्यास धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले आहे हे विशेष !
त्याबाबत त्यांनी नाशिक,सिन्नर येथील लोकप्रतिनिधींना निवेदन दिले असल्याची माहिती आहे.परिणामी हा पाझर तलाव केवळ ५० टक्केच भरला असल्याने वर्तमानात शेतकऱ्यांना हा तलाव असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला असल्याची तक्रार केली आहे.परिणामी जवळके,शहापूर,धोंडेवाडी,बहादरपूर,बहादराबाद आदी गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहीले आहे.मात्र आता शहापूर येथील ग्रामपंचायतीने या बाबत आता कोपरगावचे आ.आशुतोष काळे आणि तहसीलदार महेश सावंत,जलसंधारण विभागाचे उपअभियंता यांचेकडे गंभीर तक्रार केली आहे.
त्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की,”सदर ग्रामपंचायत हद्दीत येणारा पाझर तलाव हा कोपरगाव येथील जलसंधारण व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागाच्या अंतर्गत येतो.तो शहापूर ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्याबाबत कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही.सदर पाझर तलावाचा सांडवा हा पाथरे तालुका सिन्नर येथील काही शेतकऱ्यांनी बेकायदा बंद केला आहे.त्यामुळे बंधाऱ्यात आलेले पाणी आणि पावसाचे आलेले पाणी यास निघण्यास आता अतिरिक्त मार्ग राहिलेला नाही.त्यामुळे या पाझर तलावाखाली असलेल्या सुमारे १५० लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.सदर पाझर तलाव फुटून काही आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते याला कोण जबाबदार आहे असा गंभीर सवाल त्यानी विचारला आहे. दरम्यान मोठ्या पावसाच्या आत तो बंदिस्त केलेला सांडवा त्वरित मोकळा करावा अशी मागणी केली आहे.त्यातून काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर त्याला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव येथील जलसंधारण विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे अधिकारी आदींनी दि.१२ जून २०२५ रोजी समक्ष भेट दिली असून यात त्यांनी या पाझर तलावांस भेट दिली असून त्यास धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले आहे.त्यांनी याबाबत भूमिअभिलेख विभागाशी पत्रव्यवहार करून मोजणी शुल्क भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला असल्याचे नमूद केले असल्याने आपले पत्रात नमूद केले आहे.त्यामुळे अधिकारी आता कोणती भूमिका घेणार याकडे या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव येथील जलसंधारण उपविभाग आणि संगमनेर येथील जलसंपदा विभाग आदींनी तातडीने याबाबत दखल घेऊन या सांडव्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.अन्यथा या गावातील शेतकरी आंदोलन करतील व याची जबाबदारी जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभागावर राहील असा इशारा शहापूर येथील सरपंच योगिता रमेश डांगे यांनी शेवटी दिला आहे.