अपघात
सर्पदंशाने एक अल्पवयीन ठार,कोपरगाव पोलिसांत नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी कान्हेगाव येथील अल्पवयीन तरुण साईश रवींद्र सोळसे (वय-१२) यास नुकताच सर्पदंश झाला होता.त्यावर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचे नुकतेच निधन झाले आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतात. दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात.पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल.कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे.प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत.फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल.कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात.एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या ८८ टक्के घटना ग्रामीण भागात होतात.यात बहुतेकजण शेतीवर काम करणारे सापडतात आणि १० वर्षे ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तींना,विशेषतः पुरुषांना बहुतेक सर्पदंश होतात असे आढळून आले आहे.सुमारे ८० टक्के सर्पदंश मे (वैशाख) ते सप्टेंबर (आश्विन) या पाच महिन्यांच्या काळात होतात.कारण उष्णता आणि पावसाचे पाणी यांमुळे सापाला बिळाबाहेर पडावे लागते अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील साखरवाडी घडली आहे.येथील बारावर्षीय युवक साईश सोळसे हा आपल्या शेतात असताना दि.२४ ऑगष्ट रोजी हि दुर्घटना घडली आहे.त्यावर त्याच्या नातेवाईकांनी उपचारार्थ राहाता तालुक्यातील लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.मात्र उपचार दरम्यान त्याचा दि.२५ ऑगष्ट रोजी सकाळी ६.४० पूर्वी रोजी मृत्यू झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी आधी लोणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली होती मात्र त्या नंतर सदर नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५७/२०२३ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करत आहेत.