विशेष दिन
…या शहरात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिन व कामगार दिन कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय संस्था याठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले आहे.कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आहे.

दरम्यान कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी ध्वजारोहण केले आहे.तर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तर कोपरगाव शहर पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहन केले आहे.

महाराष्ट्र दिन हा राज्याची सुट्टीचा दिवस आहे.१ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले.त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात.या दिवशी परेड,राजकीय भाषणे आणि विविध कार्यक्रम होतात.महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी जपली जाते.मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.कोपरगाव तहसिल कार्यालयासह शहर आणि तालुक्यात हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,पोलीस निरीक्षक संदीप कोळी,मुख्याधिकारी सुहास जगताप,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे,कैलास ठोळे,पद्माकांत कुदळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव तहसील कार्यालयास येथे यावेळी आ.काळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.महाराष्ट्र दिन हा आपल्या राज्याच्या अस्मितेचा,अभिमानाचा आणि एकतेचा दिवस आहे.महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक,पौराणिक,समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे.हे बलिदान सार्थ ठरविने आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्राकडे देशातील प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते.आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला सामाजिक,आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या अधिक बळकट करण्यासाठी काम करणे गरजेचे असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे योगदान सातत्याने देत राहीन.युवकांनी शिक्षण,नवनवीन कल्पना व कौशल्याच्या जोरावर पुढे येऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा असे आवाहन आ.काळे यांनी याप्रसंगी करून महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी ध्वजारोहण केले आहे.तर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तर कोपरगाव शहर पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहन केले आहे.