पाणी पुरवठा योजना
या योजनेच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका-आमदारांची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगांव मतदार संघातील धारणगाव,सुरेगाव,शिंगणापूर पाणी पुरवठा योजना,पिंपळवाडी-नपावाडी,मळेगाव थडी,मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे रखडवणाऱ्या त्या दोन कंपन्यांना काळया यादीत टाका अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच विधानसभेत केली आहे.त्यामुळे कामे उशिरा करणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत सहा योजनाचा आवाज उशिरा का होईना उठवला असला तरी अद्याप जवळके,रांजणगाव देशमुखसह तालुक्यात २३ कामे अंशतः तर २९ कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असून या बाबत कधी आवाज उठवणार असा सवाल निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन अभियानातील पाणी पुरवठ्याचे कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ५२ पैकी केवळ १३ कामे पूर्ण होऊन हस्तांतरीत झाली असून २३ कामे अंशतः बाकी असून अद्याप २९ कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असून या योजनेचा कोपरगाव तालुक्यात निधी अभावी फज्जा उडाला असल्याची धक्कादायक बाब हाती आली असून ठेकेदारांची देणी थकल्याने सदर योजना बासनात गुंडाळल्या असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या योजना खरेच पूर्ण होणार का असा ऐन उन्हाळ्यात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत सर्वात पहिल्यांदा न्युजसेवा वेब पोर्टलने दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.त्यानंतर उन्हाळी अधिवेशन पार पडले होते.त्यावेळी यावर कोणाही आमदार अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नव्हता.मात्र आज पावसाळी अधिवेशनात उशिरा का होईना कोपरगावचे लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे यांना जाग आली असून त्यांनी आज विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यात त्यांनी ‘ जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.मेहसाणा व ‘ सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एल.एल.बी.प्रा.लि.’ या दोन कंपन्यांवर बोट ठेवले आहे.तीन वर्षापूर्वी कोपरगांव मतदार संघातील धारणगाव,सुरेगाव, शिंगणापूर,पिंपळवाडी-नपावाडी,मळेगाव थडी,मायगांव देवी या सहा पाणी पुरवठा योजनांची कामे देण्यात आली होती.

” जलजीवन योजनेचे हे ठेकेदार त्यांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत असून पाणी पुरवठा योजनांची कामे कितीही संथ गतीने केली तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही.याचा त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे.परंतु कुणाला कितीही मोठा राजाश्रय असला तरी काम करावेच लागेल”-आ. आशुतोष काळे, कोपरगाव.

दोन वर्षाची मुदत असतांना वारंवार मुदतवाढ देवूनही आजतागायत या कंपन्या पाणी योजनांची कामे पूर्ण करू शकल्या नाहीत.त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ.काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कामात हलगर्जीपणा करून नागरीकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या या दोन कंपन्यांची कामे रद्द करा. आणि या कंपन्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी सभागृहाकडे केली आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या दोन कंपन्यांच्या ठेकेदारांना पाणी पुरवठा योजनांची कामे सुमारे तीन ते साडे पाच टक्के वाढीव दराने देण्यात येवून सदर योजनांची कामे जून २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याची अट होती.परंतु सदर कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे काम अर्धवट अवस्थेत होते.त्यामुळे संबंधित ठेकेदारांना जून २०२५ अखेर पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती.परंतु मुदतवाढ देऊन सुद्धा या कंपन्यांकडून या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देता आलेली नाही त्यामुळे ह्या पाणी पुरवठा योजनांची कामे अद्यापही रेंगाळलेली आहेत.आणि ह्या योजनांची झालेली जी काही अर्धवट कामे आहेत ती कामे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत. कंपनीने काम करतांना हलगर्जीपणा करून गावातील नागरिकांना जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा गंभीर प्रकार केला आहे.ही कामे रेंगाळली असल्यामुळे या पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबत अनिश्चितता निर्माण होऊन गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलजीवन योजनेचे हे ठेकेदार त्यांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत असून पाणी पुरवठा योजनांची कामे कितीही संथ गतीने केली तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही.याचा त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे.परंतु कुणाला कितीही मोठा राजाश्रय असला तरी काम करावेच लागते.त्यामुळे कराराप्रमाणे वेळेत काम न करणाऱ्या या दोन कंपन्यांना देण्यात आलेली पाणी पुरवठा योजनांची कामे रद्द करावीत.नव्याने टेंडर काढून या पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करावीत व या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आ.काळे यांनी सभागृहाकडे शेवटी केली आहे.