जलसंपदा विभाग
शेतकऱ्यांना शेती सिंचनाचे पाणी मिळत नाही -…या नेत्याचा आरोप

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शेती सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असतांना लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही.आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली जात नाही त्याचा परिणाम आवर्तनावर होत असून आवर्तनाच्या विस्कळीतपणाबाबत वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकीत नुकताच केला आहे.

“जलसंपदा विभागाच्या तक्रारी आल्यास त्या ढिसाळ कारभाराला सर्वस्वी अधिकारी जबाबदार राहतील.कामात झालेलीं दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.लाभार्थी शेतकऱ्यांच्या जनभावना लक्षात घेवून काम करा.पूर्वीप्रमाणे चितळीला पाणी पोहचल्यावर दोन ते तीन दिवसात हरीसन ब्रांच व उजव्या तट कालव्याची नऊ चारी सुटली पाहिजे’-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांबरोबरच पालखेड व एक्सप्रेस कालव्याच्या आवर्तनासंदर्भात असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शनिवार दि.२९ रोजी शेतकऱ्यांसमवेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त अभियंता टी.के.थोरात,गोदावरी डावा तट कालव्याचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील,गोदावरी उजवा तट कालव्याचे उपविभागीय अभियंता संभाजीराव पाटील,शाखाधिकारी ए.बी.जाधव,ओ.ए.भंडारी,एस.आर.पोळ,जी.एम.चौधरी,एस.बी.चौधरी,एन.मुठाळ,आर.डी.महाजन, जी.आर.पवार,के.एस.बिऱ्हाडे,एस.एल.निर्मळ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक,पदाधिकारी,लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अधिकारी आवर्तनाबाबत शेतकऱ्यांना विस्तृतपणे माहिती देत नाही.आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून आवश्यक तयारी पूर्णपणे केली जात नसल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तन सुरु असतांना वेळेत सिंचनासाठी पाणी मिळत नाही व परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते.अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी या बैठकीत मांडल्या आहेत. कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक वितरीकेचा स्वतंत्र आढावा घेवून त्याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता काही अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे देता न आल्यामुळे आ.काळे यांनी नाराजी व्यक्त करतांना सांगितले की,”आजपर्यंत पाटबंधारे विभागाच्या एवढ्या तक्रारी आल्या नाहीत यावरून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या.ज्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरून सर्व पूर्तता केल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी दिल्याशिवाय आवर्तन बंद करू नका.शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे आपले कर्तव्य आहे याचा विसर पडू न देता अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहून शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या समस्या सोडवाव्यात.शेतकऱ्यांना पाणी मिळणे महत्वाचे असून वितरिका उकरण्याचा व स्वच्छ करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्या अशा सूचना आ.काळे यांनी यावेळी उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.