आंदोलन
निळवंडेच्या उजव्या कालव्याचे काम तातडीने सुरु करा अन्यथा आंदोलन-इशारा
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2023/05/images-2023-05-26T195707.301.jpeg)
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम जवळपास पूर्ण झाले असताना त्यात पाणी सोडून चाचणी घेणे गरजेचे असताना काही विघ्नसंतोषी नेते त्यात खोडा घालत असून डाव्या कालव्याचे काम अद्याप बंद असून त्याबाबत जलसंपदा विभागाने तातडीने कारवाई करावी अन्यथा कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांचेवर राहील असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव पाटील हारदे यांनी दिला आहे.
“जलसंपदा विभागाचे अधिकारी या प्रकल्पास विरोध असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्यातच नाशिक येथील जलसंपदाचे वरिष्ठ अधिकाऱ्यास हाताशी धरून एच.आर.व सी.आर.च्या कामांच्या मंजुऱ्या लांबवित असल्याचे दिसत आहे.त्यामुळेच या प्रकल्पास विलंब झाला आहे.देश व राज्य पातळीवरील वरिष्ठ बड्या नेत्यांची नावे घेऊन उदघाटनाच्या नावाखाली ती प्रलंबित ठेवण्याचे षडयंत्र राबविले जात आहे”-ज्ञानदेव पाटील हारदे,जेष्ठ कार्यकर्ते,राहुरी.
निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन त्यात जवळपास पंधरा वर्षापासून पाणी साठवले जात आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना मात्र उपाशी ठेवले जात आहे.दुष्काळी शेतकऱ्यांना या कालव्यांचे काम पूर्ण होऊन त्यांना पाणी मिळावे यासाठी कालवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे आदींनी मुंबई उच्च न्यायालयाचे छ.संभाजीनगर येथील खंडपीठात सन-२०१६ मधील सप्टेंबर महिन्यात जनहित याचिका दाखल केलेली होती.त्यानुसार जलसंपदा विभागाने कालव्यांचे काम ऑक्टोबर २०२३ मध्येच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन व प्रतिज्ञापत्र मार्च २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे छ.संभाजीनगर खंडपीठापुढे दिले होते.त्याप्रमाणे काम सुरु केले होते.सदर काम कोरोना साथीतही वेगाने सुरु होते.मात्र गतवर्षी झालेल्या मोठ्या पर्जन्यमानामुळे सदर मुदत जलसंपदा विभागाने डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून घेतली होती.मात्र पुढे राज्याच्या महसूल विभागाकडून खडी आणि वाळू आदी गौण खनिज मिळण्यात अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या.त्यामुळे सदर मुदत पुन्हा एकदा वाढवून डावा कालवा हा मार्च २०२४ तर उजवा कालवा जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन न्यायालयापुढे दिले होते.मात्र डावा कालवा मुदत संपुनही पूर्ण झालेला नाही.मध्यंतरी अकोले तालुक्यातील काम बंद करून,”शेतकरी काम बंद करतात” अशी बतावणी केली गेली.त्यात जवळपास महिना भर काम बंद ठेवले होते.आता राहुरी तालुक्यातील उजवा पुंच्छ कालवा बंद असून त्या तालुक्यातील कालव्यांचे कामासाठी आवश्यक भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही.डाव्या कालव्याचे काम पुंच्छ भागात पूर्ण क्षमतेने चालू नाही.त्यासाठी काहींना काही कारणे दाखवून कालहरण करण्याचे काम सुरु आहे.त्यामुळे डाव्या कालव्यांची मुदत संपुनही सदर काम पूर्ण झालेले नाही.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी नानासाहेब जवरे आणि रुपेंद्र काले आदींनी उच्च न्यायालयाचा दि.१८ जानेवारी २०२३ रोजी आदेश मिळूवन सदर काम ३१ मार्च अखेर पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र मिळवले होते.मात्र जलसंपदा विभाग त्यास बधला नाही.त्यानंतर कृती समितीने दि.०३ मार्च,०९ एप्रिल,०२ मे २०२३ रोजी वेळोवेळी निवेदने देऊन सदर काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी वारंवार समक्ष व लेखी वारंवार पाठपुरावा करूनही जलसंपदा विभागाने राजकीय दबावापोटी म्हणावा असा प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान कामात जलसंपदा विभागाचे अधिकारी या प्रकल्पास विरोध असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्यातच नाशिक येथील जलसंपदाचे वरिष्ठ अधिकाऱ्यास हाताशी धरून एच.आर.व सी.आर.च्या कामांच्या मंजुऱ्या लांबवित असल्याचे दिसत आहे.त्यामुळेच या प्रकल्पास विलंब झाला आहे.देश व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची नावे घेऊन उदघाटनाच्या नावाखाली ती प्रलंबित ठेवण्याचे षडयंत्र राबविले जात आहे.व सदर पाणी आपल्या दारू कारखान्यांना वापरले जात आहे.त्याबाबत मूळ भाजपा नेत्यांनी त्यास बळी पडू नये असे आवाहन करून याबाबत कालवा समिती उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार असून अवमान याचिका दाखल करणार आहे.
या शिवाय समिती स्थानिक पातळीवर दुष्काळी शेतकऱ्यांत जागृती करणार असून त्याबाबत प्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका घेणार आहे.हा शेवटचा पत्रव्यवहार समजावा असा इशारा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,कार्यकारी संचालक,गोदावरी खोरे पाटबंधारे विकास मंडळ,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता आदींना दिला आहे.व आगामी काळात होणाऱ्या आंदोलनास जलसंपदा विभाग व अ.नगर जिल्हाधिकारी आदी जबाबदार राहाणार आहे असा इशाराही ज्ञानदेव पाटील हारदे यांनी शेवटी दिला आहे.