पणन
…या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
शेतमालालाभाव नाही;पीक होऊनही खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी करताना ७० रुपयांची हमाली,तोलाई शेतकऱ्यांच्या माथी लादल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट झाल्याचे उघड झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.यातील दोषींवर जिल्हा निबंधक काय कारवाई करणार असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

“कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची हमाली,तोलाई ही नाफेड हमालांना नंतर देते तो पर्यंत ते थांबत नाही परिणामी ती शेतकऱ्याकडून वसूल करवी लागत आहे.मात्र ती नाफेड कडून आल्यावर दिली जाते का ? यावर त्यांनी याबाबत आपल्याला आयडिया नाही,ती माहिती बाजार समितीचे सचिव देऊ शकतील”-साहेबराव रोहोम,सभापती,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,’ राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.पीकाचे उत्पन्न होऊनही त्याचा साधा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अशा स्थितीत नाफेड मार्फत कोपरगाव तालुक्यात सोयाबीन खरेदी सुरू झाल्याने बाजार दरापेक्षा ५०० ते १००० रुपयापर्यंत प्रतिकिलो दर जास्त दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता.त्यात शेतकऱ्याकडून हमाली,तोलाई घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता.यासाठी सरकारने ४८ रुपये क्विंटल ची तरतूद केलेली आहे.मात्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याकडून प्रती क्विंटल ७० रुपयांची लूट करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.तथापि कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच दिल्या असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

“नाफेड कडून येणारी हमाली तोलाई (४८ रू.प्रती क्विंटल) ही ‘टफ’साठी (शेतमाल चाळणीने स्वच्छ करण्यासाठी) व माल वाहतूक करणेसाठी वापरली जात आहे.कारण कोपरगाव येथे वेअर हाऊस उपलब्ध नसल्याने सदर माल हा मनमाड येथे पाठवावा लागला आहे”- नानासाहेब रणशुर,सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती,कोपरगाव.
नाफेड मार्फत खरेदी होत असताना बाजार समिती खरेदी-विक्री संघाकडून शेतकऱ्यांसाठी काही चांगले करण्याची संधी असताना राजकीय हस्तक्षेपामुळे इच्छाशक्तीअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केंद्रावर चकरा माराव्या लागतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.परिणामी सध्या ग्रामीण भाग प्रचंड अस्वस्थ आहे.त्याचे कारण मागील वर्षातील दुष्काळ आणि मागील तीन-चार वर्षांपासून शेतमालाला न मिळणारे बाजारभाव आणि त्याच्या जोडीला पन्नास वर्षांतील विक्रमी बेरोजगारी.दुष्काळ आणि शेतमालाला न मिळणारे बाजारभाव,त्याकडे त्यावेळच्या सरकारचे होणारे दुर्लक्ष व मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी होणारे सर्व निर्णय नि त्यातून जन्माला आलेली नाफेड खरेदी.मात्र आजही शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी जन्मास आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आज लुटीचे केंद्र ठरल्या आहेत हे विशेष ! एरव्ही निवडणुकात यांच्या नेत्यांची भाषणे हे शेतकऱ्यांचे मोठे कैवारी असल्याच्या थाटात असतात मात्र निवडणुका संपल्या की हीच मंडळी शेतकऱ्यांचे शोषक असल्याचे वारंवार निष्पन्न होत आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही विद्यमान आ.आशुतोष काळे यांच्या ०६ जागा,माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या ०७ जागा,राजेश परजणे व नितीन औताडे यांच्या गटाच्या प्रत्येकी ०२ जागा बिनविरोध करून ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनविरोध म्हणून मोठे ढोल पिटून बिनविरोध लढवली गेली होती.वास्तवात आज हे चारही गट,’आम्ही सर्व भाऊ-भाऊ आणि सर्व मिळून खावू’ च्या इतक्या नीचांकी पातळीवर पोहचले आहे.याची वर्तमान संचालकांच्या नेत्यांना खबरबात नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.याबाबत समितीच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यास व प्रशासनातील अधिकाऱ्यांवर ईशान्य गडावरील ज्येष्ठ नेत्याने चांगलेच तोंडसुख घेतल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.तीच बाब दूध संघाशी संबधित नेत्याची झाली असून त्यांना ही आपल्या संचालकांचा नंगानाच माहिती झाला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.मात्र ‘तेरी चूप आणि मेरी चूप’ अशी त्यांच्या नेत्यांची अवस्था झाली आहे.
दरम्यान एका माहिती नुसार नमुण्यासाठी जो शेतमाल येतो त्या जवळपास ०६ क्विंटल सोयाबीनची एका प्रशासनात असणाऱ्या अधिकाऱ्याने परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.शिवाय एका ठेकेदाराकडून काही कामांचे बिल काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सुमारे १० टक्के निधी लाटला असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी हमाली,तोलाई ही नाफेड हमालांना नंतर देते तो पर्यंत ते थांबत नाही परिणामी ती शेतकऱ्याकडून वसूल करवी लागत असल्याची सांगितले आहे.मात्र ती नाफेड कडून आल्यावर दिली जाते का ? यावर त्यांनी याबाबत आपल्याला आयडिया नाही,ती माहिती बाजार समितीचे सचिव देऊ शकतील असे सांगून आपली बोटे सोडवून घेतली आहे.
याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”बाजार समितीने संपलेल्या रब्बी हंगामात एकूण ०८ हजार ५०० क्विंटल सोयाबीन खरेदी केली असल्याची माहिती दिली आहे.नाफेड कडून येणारी हमाली तोलाई ही ‘टफ’साठी (शेतमाल चाळणीने स्वच्छ करण्यासाठी) वापरली जाते,शिवाय सदर माल वाहतूक करणेसाठी वापरली जात असल्याची माहिती दिली आहे.कारण वेअर हाऊस येथे उपलब्ध नसल्याने सदर माल हा मनमाड येथे पाठवावा लागला असल्याची बतावणी केली आहे.शिवाय बाजार समितीतून नमुना शेतमाल हा परस्पर विक्री करणे बाबत विचारणा केली असता त्यांनी वर्तमानात बाजार समितीत चार गट कार्यरत असून सर्वांना खुश ठेवणे शक्य नसल्याने नाराज गट या अफवा पसरवत असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.