महसूल विभाग
…ही लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवा – आवाहन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख योजना असून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती शासनाने हा अभिनव उपक्रम सुरु केला असून यातील पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला केल्या आहेत.

कोळपेवाडी येथे समाधान शिबीर प्रसंगी लाभार्थ्यांना विविध दाखले व अनुदान वाटप करतांना आ.काळे समवेत अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर,तहसीलदार महेश सावंत,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते व मान्यवर.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव महसूल मंडळाच्या गावातील नागरिकांसाठी कोळपेवाडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर नुकतेच संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर होते.
सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,भूमी अभिलेख अधिकारी रमाकांत डावरे,विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,सचिन चांदगुडे,वसंतराव आभाळे,श्रीराम राजेभोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे,संभाजी काळे,दिलीप चांदगुडे,सरपंच चंद्रकला कोळपे,उपसरपंच शितल कोळपे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,तसेच सोमनाथ चांदगुडे,सुभाष गाडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सुरेगाव मंडळातील सुरेगाव,मढी बु.,मढी खु.,देर्डे चांदवड, कोळपेवाडी शहाजापूर,कोळगाव थडी,मंजूर, हंडेवाडी,वेळापूर,कारवाडी,चासनळी,वडगाव, बक्तरपुर,माहेगाव देशमुख आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”महायुती शासन हे सर्वसामान्य जनतेचे शासन आहे.शासनाला समाजाच्या अडीअडचणींची जाणीव असून समाजाच्या उत्कर्षासाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जात आहे.दिव्यांग बांधवांना यापूर्वी दिल्या जाणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करून हे अनुदान अडीच हजार रुपये करण्यात आले आहे.शासनाच्या विविध विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत मात्र या योजनांसाठी पात्र असतांना देखील नागरिक अशा योजनांचा लाभ घेवू शकत नाही.त्यामुळे पात्र नागरीकांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीराच्या माध्यमातून शासनच जनतेच्या दारात पोहोचले आहे. समाधान शिबीरात येणाऱ्या नागरीकांना अचूक मार्गदर्शन करा. ज्या योजनांसाठी नागरीक अर्ज भरणार आहे त्या योजनेसाठी ते पात्र असतील तरच त्यांचे अर्ज भरा उगाच चकरा मारायला लावू नका. कार्यकर्त्यांनी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी समाजातील गरजवंत पात्र लाभार्थी नागरिक शोधून त्यांचे आवश्यक कागदपत्र जमा करून जास्तीत जास्त नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.