निवडणूक
व्यापारी महासंघ कोयटेंसोबत नाही -दावा ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश कोयटे यांनी कोणालाही विश्वासात न घेता अचानक रात्रीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या एकतर्फी निर्णयामुळे व्यापारी महासंघाची प्रतिमा व तटस्थता धोक्यात आली असून,या प्रकारास व्यापारी बांधवांचा स्पष्ट विरोध असल्याचे प्रसिद्धीपत्रक संघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल यांचेसह अनेकांनी दिले आहे.

“व्यापारी महासंघ हा कोणाचाही राजकीय अड्डा नाही.व्यापाऱ्यांचे प्रश्न,व्यवसायवृद्धी,बाजारपेठेचा विकास आणि व्यापाऱ्यांचे हित जपणे हा महासंघाचा मूळ उद्देश आहे.अशा परिस्थितीत महासंघाचा वापर करून एकाकी व वैयक्तिक राजकीय भूमिका घेणे म्हणजे संपूर्ण तटस्थ व्यापारी वर्गावर राजकीय शिक्का मारण्यासारखे आहे,आणि हे कृत्य अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे”-केशव भवर,माजी गटनेते जिल्हा परिषद,अहिल्यानगर.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आता शेवटच्या टप्यात आली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडत आहे.त्यात आता पाणी चोरी,भ्रष्टाचार आदींवर आरोप होऊ लागले असून थेट हल्ले होऊ लागले आहे.मर्यादा ओलांडल्या जात आहे.विशेष म्हणजे या सर्व एकाच झाडाच्या फांद्या असून ते निवडणुकीत एकमेकावर आरोपांची कुऱ्हाड चालवताना दिसत आहे.आता तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांना घेरण्याची संधी त्यांच्या अंतर्गत विरोधकांना आयती चालून आली असल्याचे दिसून येत आहे.त्याबाबत आज व्यापारी संघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल व केशव भवर यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात हा आरोप केला आहे.

दरम्यान या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,”एकीकडे व्यापारी महासंघाच्या नावाने कोल्हे व काळे परिवाराकडून कोयटे यांनी मदत घेतली आहेआणि दुसरीकडे महासंघाचे नाव वापरून वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधला जात आहे,ही बाब कोणत्याही व्यापाऱ्यांना मान्य होण्यासारखी नाही.त्यामुळे व्यापारी महासंघात असंतोष वाढला असून संघटनेत उभी फूट पडल्याचा आरोप केला आहे.या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघ कोयटे यांच्या पाठीशी नसल्याची भूमिका महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान यात व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तसेच बहुसंख्य सदस्यांनी संयुक्तपणे आपली भूमिका जाहीर करताना सांगितले की,”व्यापारी महासंघ हा कोणाचाही राजकीय अड्डा नाही.व्यापाऱ्यांचे प्रश्न,व्यवसायवृद्धी,बाजारपेठेचा विकास आणि व्यापाऱ्यांचे हित जपणे हा महासंघाचा मूळ उद्देश आहे.अशा परिस्थितीत महासंघाचा वापर करून एकाकी व वैयक्तिक राजकीय भूमिका घेणे म्हणजे संपूर्ण तटस्थ व्यापारी वर्गावर राजकीय शिक्का मारण्यासारखे आहे,आणि हे कृत्य अत्यंत चुकीचे व निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यापुढे व्यापारी महासंघ नावाचा वापर करून फायदा पाहणाऱ्या कोणत्याही फसवणुक करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक राजकीय भूमिकेला पाठिंबा देणार नसून,संघटना केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच कार्यरत राहील,तसेच अशा विश्वासघात करणाऱ्या प्रवृत्तीला आम्ही योग्य तो धडा ठरवू असा ठाम निर्णय महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.यात उपाध्यक्ष नारायण अग्रवाल,उपाध्यक्ष केशव भवर,बबलूशेठ वाणी,संतोष गंगवाल,सत्येन मुंदडा,महावीर दगडे आदींच्या वतीने ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे आता यावर राष्ट्रवादीचे उमेदवार आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोटे काय भूमिका घेणार याकडे शहरातील व्यापाऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.



