कोपरगाव शहर वृत्त
शहरातील रस्त्याचे काम बंद,सत्ताधारी गटाचा घरचा आहेर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु असून त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.ठेकेदाराच्या मनमानीमुळे सोमवार दि.१३ रोजी बाजारचा दिवस असूनही प्रभाग ५ मधील व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ठेकेदाराची मनमानी बंद करून सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष धनंजय कहार यांनी नुकतीच केली आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाला हा घरचा आहेर समजला जात आहे.
कोपरगाव नगरपरिषदेत सव्वा वर्षापासून प्रशासक राज आहे.तालुक्यात आमदार राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे सदर तक्रार करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असल्याने हा घरचा आहेर समजला जात आहे.त्यामुळे प्रशासक लोकप्रतिनिधीचे ऐकत नाही का ? असा सवाल शहर वासियांच्या मनात निर्माण झाला आहे.त्याला सत्ताधारी गट काय उत्तर देणार आहे हि खरी समस्या आहे.
कोपरगाव शहरातील अनेक रस्ते मंजूर असून त्यांचे कामे अद्याप सुरु झालेली नाही तर काहींचे सुरु झाले मात्र त्याला अपेक्षित गती नाही त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.त्याचा नमुना वर्तमानात प्रभाग ५ मध्ये दिसून येत आहे.तेथील रस्त्याचे काम सुरु असून त्याला गती मिळताना दिसत नाही.त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना हाल सहन करावे लागत आहे.परिणामी त्यांचे व्यवसाय मंदावले आहेत.काही दिवसांपूर्वी रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा कासवगतीने सुरु झाले.मात्र या मनमानी ठेकेदाराने रस्त्यातच खडी,मातीचे मोठे ढिगारे टाकल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.त्यामुळे बाजारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना दुकानापर्यंत जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.त्यामुळे सोमवार असूनही प्रभाग ५ मधील व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले.परिणामी संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली व सराफ बाजाराकडे जाणारा रस्ता देखील बंद झाला होता त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान या मनमानी ठेकेदारामुळे झाले आहे.
मार्च अखेरीच्या वसुलीसाठी नागरिकाकडून कर वसूल करण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जात आहेत.मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून रस्त्याचे काम सुरु असतांना नगरपरिषदेचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित राहत नाही यावरून हे काम दर्जेदार होईल का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ठेकेदाराकडून या रस्त्याचे दर्जेदार काम होईल याची कोपरगाव नगरपरिषदेने काळजी घ्यावी.व व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी या मनमानी ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करून घ्यावे अशी मागणी धनंजय कहार यांनी शेवटी केली आहे.