जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

जनता दरबारात दूषित पाणी,अवैध व्यवसाय आणि अतिक्रमण मुद्दे गाजले !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
    
   कोपरगाव शहरात आज संपन्न झालेल्या जनता दरबारात नागरिकांच्या पिण्याचे दूषित आणि उशिराने मिळणारे पाणी आणि अतिक्रमण विरोधी मोहीम कशी आमच्या मुळावर उठली यावरच केंद्रीभूत असल्याचे निष्पन्न झाली असून आज झालेल्या दरबारात पालिकेचा अनेक बाबतीत निर्माण झालेला भोंगळ कारभार मात्र उजेडात आला असून त्यामुळे नागरिकांनी या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले असून याबाबत आ.आशुतोष काळे यांना अधिकचे लक्ष घालण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

“आपण नगरपरिषदेत घरपट्टी भरली होती मात्र एका कर्मचाऱ्याने ती स्वतःच्या मोबाईल खात्यात भरून घेतली असल्याचा आरोप केला आहे.त्याची साधी पावती आपल्याला दिली नाही.याबाबत आपण मुख्याधिकारी जगताप यांचेकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही हे विशेष !- शिवाजी खांडेकर,माजी सभापती,कोपरगाव नगरपरिषद.

    गतवर्षी लोकसभा निवडणुका आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या असून त्या कमी की काय पालिकेत गेली साडेतीन वर्षे सातत्याने प्रशासन राज असल्याने कारभार अनियंत्रित झाला असल्याचे पार्श्वभूमीवर आज आ.आशुतोष काळे यांनी स्वतंत्रपणे विभागनिहाय जनता दरबार सुरू केल्याने नागरिकांच्या समस्या कमी व प्रशासनावर वचक निर्माण होताना दिसत असून आज कोपरगाव नगरपरिषदेचा जनता दरबार आयोजित केला होता.त्यावेळी हा गोंधळ समोर आला आहे.

“कोपरगाव बाजार तळावरील ओटे बांधूनही त्याचा वापर होत नसल्याने त्याठिकाणी अवैध व्यवसायास ऊत आला आहे.त्या ठिकाणी थेट मालेगाव आणि तत्सम शहरातून किन्नर येऊन संदिग्ध व भीतीयुक्त नाना विधी करत असल्याचे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.शिवाय या भागात ग्रामीण भागातून गुटखा आणि अनिष्ट व्यसन करणारे तरुण येत असून त्या ठिकाणी खूनही झाले आहे याची दखल घेणे गरजेचे आहे”- भरत मोरे,माजी शहर प्रमुख (ऊबाठा) शिवसेना.

   सदर प्रसंगी युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष कृष्णा आढाव,कोपरगाव नगरपालिकेचे माजी गटनेते डॉ.अजेय गर्जे,विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,शिवाजी खांडेकर,फकीर कुरेशी,मुख्याधिकारी सुहास जगताप,उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडेजा,आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण,आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख आदीसह मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित होते.

  

दरम्यान दूषित पाण्याने राजूर अकोले येथे कावीळ रोगाची साथ आलेली असताना कोपरगाव पालिका हद्दित दूषित पाणी दिले जात असल्याबाबत अनेक नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत.पाणी उशिरा सोडले तरी चालेल पण किमान स्वच्छ पाण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

   एक तास उशिराने सुरू झालेल्या या जनता दरबारात मनसेचे बापू काकडे,आयुब शेख,उबाठाचे माजी शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांनी आमच्या वर कसा अन्याय केला याचे पाढे वाचले आहे.त्यावेळी अस्लम शेख यांनी बस स्थानकाचे उत्तर बाजूस असलेली जागेची बाब सन-१९८७ पासून न्याय प्रविष्ठ असल्याचे सांगून पालिकेची कारवाई अयोग्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे तर आयुब शेख यांनी बस स्थानकाचे उत्तर बाजूस असलेली सर्व्हे क्रं.२१५ ही जागा ही कोपरे व दुशींग यांची खाजगी असल्याचे सांगून राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानक हेच अतिक्रमणाचा असल्याचा आरोप करून गोंधळ उडवून दिला आहे.कहर तर तेंव्हा झाला समतानगर येथे एका माजी पोलीस अधिकाऱ्याने सर्व्हे क्रं.१९९ मध्ये ओपनस्पेस मध्ये पाच मजली इमारत उभी करून पालिकेसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याचा आरोप तेथील रहिवासी रामेश्वर बैरागी यांनी नागरिकांच्या वतीने केला आहे व सदर माजी अधिकारी हा कोणालाही जुमानत नसल्याची गंभीर बाब आ.आशुतोष काळे यांचे निदर्शनास आणून दिली आहे.त्याला पालिकेतील काही अधिकारी बेकायदा कामास पाठीशी घालत असल्याचा आरोप केला असून सदर जागा स्थानिक नागरिकांची नसली तरी पालिकेची असून त्याची जबाबदारी अधिकारी टाळून अतिक्रमण धारकास पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.त्यावर स्थापत्य अभियंता किरण जोशी संबधितास नोटीस बजावली असल्याचे सांगून सदर बाब न्याय प्रविष्ट असल्याची बतावणी केली असल्याचे सांगून त्या जागी स्थगिती आलेली असल्याचे सांगितले आहे.त्यावर बापू काकडे यांनी सदर बांधकाम हे अधिकाऱ्याचे असल्याने त्यास पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला आहे.

  यावेळी दौलत महाले यांनी वडांगळे वस्तीवर सांडपाणी निघून जाण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे त्यामुळे सदर ठिकाणी ५०/१०० आकाराचा तलाव निर्माण होऊन तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील नागरिकांना कावीळ वा तत्सम साथ उद्भवू शकते त्यामुळे आ.काळे यांनी या कामी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.त्यावर आ.काळे यांनी संबधित अधिकारी हर्षवर्धन सुराळकर यांना विचारणा केली आहे.त्यावर त्यांनी त्या जागी अतिक्रमण असल्याची बाब आ.काळे यांचे लक्षात आणून दिली आहे.शिवाय तेथील गटारीचे काम सुरू होते.मात्र ठेकेदार यांचेवर आरोप झाल्याने काम बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.त्यावेळी आ.काळे यांनी सदर ठिकाणी २३० मीटरचे काम मंजूर असून त्यासाठी १५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगून तेथील नागरिकांना दिलासा दिला आहे.

   सदर प्रसंगी सागर लकारे या नागरिकाने आपण २०२१ मध्ये नियमित घर पट्टी आणि नळपट्टी भरली होती.नंतर मात्र घरपट्टी आणि नळपट्टी वर अधिकाऱ्यांनी अन्याय कारक पद्धतीने दंड आणि व्याज आकारले आहे.या पूर्वी व्याज आकारत नसल्याची बाब लक्षात आणून दिली आहे.त्यावर मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी व्याज आणि दंड कमी करण्याचे अधिकार आम्हास नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.त्यावर माजी गटनेते डॉ.अजेय गर्जे यांनी आमच्या वेळी आम्ही ठराव घेऊन नागरिकांचे दंड आणि व्याज माफ केले असल्याची आठवण करून दिली आहे.तर उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडेजा यांनी सदर चूक ही संगणकाच्या प्रिंटिंग मुळे झाली आसल्याने सांगून त्यामुळे दंड आणि व्याज न आकारता पाणी पट्टी आणि घरपट्टी दिली असल्याचे सांगून टाकले व त्यामुळे घर मालकाचा गैरसमज झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

   यावेळी उबाठा सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी बाजार तळावरील ओटे बांधूनही त्याचा वापर होत नसल्याचा आरोप केला आहे.परिणामी त्याठिकाणी अवैध व्यवसायास ऊत आला आहे.त्या ठिकाणी थेट मालेगाव आणि तत्सम शहरातून किन्नर येऊन संदिग्ध व भीतीयुक्त नाना विधी करत असल्याचे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.शिवाय या भागात ग्रामीण भागातून गुटखा आणि अनिष्ट व्यसन करणारे तरुण येत असून त्या ठिकाणी खूनही झाले आहे.त्यामुळे सदर ओटे एकतर काढून टाका किंवा त्या ठिकाणी बाजार सुरू करा अशी मागणी त्यांनी केली आहे.बाजार ओट्यांच्या आश्रयाने अनेक अनैतिक गुन्ह्यांना या ठिकाणी बरकत आली असल्याचे सांगून सदर ठिकाणी कंडोम देखील सापडत असल्याचा गंभीर आरोप करून अनेकांना धक्का दिला आहे.तेथील या गोंधळाने गर्दी होऊन वेळेत एका डॉक्टरला डॉ.मुळे रुग्णालयात उपचार घेता न आल्याने जीव गमवावा लागला असल्याचे बाब निदर्शनास आणून दिली आहे.व त्या ठिकाणी असलेला कचरा डेपो ताबडतोब हलवावा अशी मागणी केली आहे.

   दरम्यान भरत मोरे यांनी शहरात पालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे.शहराची स्थिती खूपच वाईट झाली असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे अतिक्रमणाने विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना खोका शॉप सुरू करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आ.काळे यांनी सोडवावा अशी मागणी केली आहे.याबाबत नगरपरिषदेने वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही अधिकारी खूप गोड बोलतात पण काम करत नसल्याचा आरोप केला असताना अधिकाऱ्यांनी आपल्याला ही बाब उपस्थित केल्याने टार्गेट करू नये असे आवाहन केले आहे.

   यावेळी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी अंबिका नगर येथील रस्त्याची वाट लागली असल्याची  बाब लक्षात आणून दिली आहे व प्रल्हाद मोरे ते दत्तनगर या रस्त्याचे काम आणि गटारीचे काम तातडीने करावी अशी मागणी केली आहे.या कामामुळे आम्हाला महिला आणि नागरिकांच्या शिव्या खाव्या लागत असल्याचे सांगून टाकले आहे.

    दरम्यान सदर प्रसंगी माजी सभापती शिवाजी खांडेकर यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छतागृहाचे दरवाजे आणि भांडे गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगून लक्षवेधी केली आहे.तर आपण नगरपरिषदेत घरपट्टी भरली होती मात्र एका कर्मचाऱ्याने ती स्वतःच्या मोबाईल खात्यात भरून घेतली असल्याचा आरोप केला आहे.त्याची साधी पावती आपल्याला दिली नाही.याबाबत आपण मुख्याधिकारी जगताप यांचेकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी आ.काळे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना यांना जाब विचारला आहे व नगर परिषदेचे बँकेत स्वतःचे खाते नाही का ? अशी विचारणा केली व बँक अधिकाऱ्यास फोन लावून स्कॅनर उपलब्ध करून देण्याचे फर्मान सोडले आहे.

   दरम्यान दूषित पाण्याने राजूर अकोले येथे कावीळ रोगाची साथ आलेली असताना कोपरगाव पालिका हद्दित दूषित पाणी दिले जात असल्याबाबत अनेक नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत.पाणी उशिरा सोडले तरी चालेल पाणी स्वच्छ पाण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.याबाबत आ.काळे यांनी याप्रश्नी लक्ष घालायचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close